जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात सध्या सूर्यनारायण आग ओकात असून, वाढत्या तापमानाने आता बळी घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत खान्देशात उष्माघाताने ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत पारा ४५ अंशांच्या वर गेल्याने दुपारी १२ ते ५ या काळात जणू ‘कर्फ्यू’ लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. शेतमजूर आणि बांधकाम कामगारांचे हाल होत असून, वाढत्या मृत्यूसंख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उष्माघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. उष्णतेमुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उष्माघात कक्षाची पाहणी केली. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
डॉक्टरांनी नागरिकांना दिवसभरात भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे तसेच लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.







