जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विभागाची भाकरी फिरवली. पहिल्या टप्यात पोलिस मुख्यालयात १५ ते २० वर्षे साइड पोस्टिंगवर असलेल्या २३२ जणांच्या बदल्या बुधवारी केल्या. गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्हाभरात एकाच विभागात सेवा बजावणाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

पोलिस दलाचे मनुष्यबळ साडेतीन हजारांच्या घरात आहे. प्रशासकीय कारणासाठी पहिल्या टप्यात होणाऱ्या बदल्यांमध्ये यंदा प्रथमच २३२ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस दलात असताना मुख्यालयात साइड पोस्टिंग घेऊन इतर उद्योग करणारे, वरिष्ठांची मर्जी संपादन करून प्रशासकीय कामकाज करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे या बदल्यांमुळे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, चाळीसगाव व चोपडा हे चार विभाग आहेत पोलिस दलातील अनेक कर्मचारी एकाच विभागातील तालुक्याच्या ठिकाणच्या २/३ पोलिस ठाणे, लगतच्या गावाचे पोलिस ठाणे अशा ठिकाणी बदल्या करून संपूर्ण सेवा स्वतःच्या स्थानिक तालुक्यातच पूर्ण करतात. त्यांचा शोध घेऊन त्यांची उचलबांगडी करून त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे.
बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्तचे दिले आदेश
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्व संबंधित पोलिस स्टेशन प्रभारी आणि राखीव पोलिस निरीक्षकांना बदली झालेल्या अंमलदारांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचा अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. ज्या अंमलदारांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास टाळाटाळ केली, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.