⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मार्चमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १७७ कोटी वितरित ; जळगावला मिळाला ‘एवढ्या’ कोटींचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये राज्यातील जळगाव जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान, आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधी वितरित केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 18364 शेतकऱ्यांना 20 कोटी 42 लाख 61 हजार रूपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी असा: अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार