⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी ! गिरणा धरणाचा साठा निम्म्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । यंदा झालेल्या दमदार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेल्या गिरणा धरणात सध्या फक्त ४६ टक्के साठा आहे. मात्र, उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र पुढच्या सहा महिन्यातच साठा निम्म्यावर आला आहे. वाढत्या बाष्पीभवनामुळे उपलब्ध साठा जपून वापरावा लागणार आहे. चाळीसगाव शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून उचल केलेले पाणी डेराबर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून शहरातील सात जलकुंभांद्वारे संपूर्ण शहरातील २० हजार नळ कनेक्शनधारकांना पाणी पुरवले जाते. प्रत्येक वाॅर्डात चार दिवसाआड दोन तास पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी चाळीसगाव तालुक्यात विक्रमी पाऊस झाल्याने तालुक्याला वरदान ठरणारे गिरणा, मन्याड या प्रकल्पांसह सर्व १५ लघु प्रकल्पही तुडुंब भरले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा कमालीचा वाढल्याने सर्वच धरणांमधील जलपातळी झपाट्याने कमी होत आहे. १०० टक्के भरलेल्या गिरणा धरणात आज अखेर ४६ टक्के, तर मन्याडमध्ये केवळ ३९ टक्के साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पावसाळा लवकर सुरू झाल्यास टंचाई नसेल. मात्र, पावसाचे आगमन विलंबाने झाल्यास टंचाई जाणवू शकते.