जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । जिल्हा परिषदेतील १९९० मधील बनावट ठेकेदारांच्या नावाने हतनूर पुनर्वसन प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या बिलांच्या प्रकरणात काही कंत्राटदारांसह 13 जणांविरोधात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असून काही सूत्रधार मात्र फरार होते. या फरार असलेल्या आरोपींवर नव्याने दोषारोपत्र दाखल केले जाणार आहे.

‘या’ १३ जणांवर होता गुन्हा दाखल?
या प्रकरणात डी. के. जैन यांच्या फिर्यादीवरून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात विजय अग्रवाल, जगन्नाथ पाटील, प्रभाकर बारपाडे, बसप्पा रामलिंगप्पा, संतोषकुमार कौल, अजय अग्रवाल, अली हुसेन कायमत अली बोहरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर या प्रकरणातील अशोक अग्रवाल, धनसिंग राजपूत, आनंदराव पाटील, रेणुकादास कंधारकर हे मृत झाले आहेत. यातील सुरेश रामेश्वर अग्रवाल आणि सतिश रामेश्वर अग्रवाल यांच्याविरोधात स्वतंत्र दोषारोपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सीआयडीने हे जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली असून लवकरच डी. के. जैन यांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
जिल्हा परिषदेत सन 1983 ते 1985 या काळात बोगस बिले सादर करून पैसे काढले जात असल्याची बाब सन 1990 च्या काळात लक्षात आली होती. तत्कालीन सीईओंनी याबाबत बिलांची अक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केली होती. त्यात एस. आर. शर्मा, ओ. आर. शर्मा आणि पी. पी. घोडके यांच्या नावाचे बनावट बिल तयार करण्यात आले होते. या तीनही बिलांवर अशोक अग्रवाल यांची स्वाक्षरी होती. स्वाक्षरीचे हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर तत्कालीन सीईओंनी 8 एप्रिल 1990 रोजी पोलिसांना गोपनीय पत्र पाठवली होती. त्यावरून एकूण 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.