⁠ 
सोमवार, मे 6, 2024

दुर्दैवी! धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज। १४ ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या ४५ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून ४४ मिनीटांच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अनिल शामराव पाटील (वय-४३) रा. कांचन नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिल पाटील हा तरूण आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह कांचन नगर परिसरात वास्तव्याला होता. पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. जळगाव ते भादली दरम्यान आलेल्या आसोदा रेल्वे गेटजवळील अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२०च्या ८ जवळ सोमवारी १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून ४४ मिनीटांच्या सुमारास अनिल पाटील याचा मृतदेह आढळून आला.

कोणत्यातरी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह हा अनिल पाटील याचाच असल्याची ओळख पोलीसांनी पटविली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात वडील शामराव बंडू पाटील, आई इंदूबाई, पत्नी प्रतिभा, भाऊ सुनिल तसचे राणी आणि हर्षल ही दोन मुले असा परिवार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.