जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२६ । जळगावसह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः हैराण झाले होते. मात्र रविवारी सकाळी हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहाटे तीन वाजल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी केळी पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

आज रविवारी सकाळपासूनच जळगाव शहरासह जिल्ह्यात आकाश पूर्णपणे ढगाळ असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. जिल्ह्याला पुढील ३ दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यादरम्यान जिल्ह्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.






