जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असल्याने नागरिक उष्णतेच्या झळांनी होरपळून निघत आहे. पुढील महिन्यात तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज आहे.अशा परिस्थितीत युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टने (ECMWF) दिलासादायक बातमी दिली आहे. यावर्षी मान्सूनचे भारतात लवकर आगमन होण्याची शक्यता असून, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पावसाचे थेंब बरसू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनचे वेळापत्रक कसे असेल?

हवामान अंदाजानुसार, नैऋत्य मौसमी वारे (मान्सून) सर्वात आधी १८ ते २५ मे दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर धडकतील. त्यानंतर २५ मे ते १ जून या कालावधीत मान्सून केरळसह भारताच्या मुख्य भूभागाकडे सरकेल. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये मान्सून २७ मे रोजी दाखल झाला होता, यंदाही तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
तापमानाचा पारा वाढणार, पण दिलासा जवळ!
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मे महिन्यात तापमान अधिक वाढणार असले तरी, याच महिन्याच्या शेवटी पावसाचे आगमन होणार असल्याने नागरिकांना कडाक्याच्या उन्हातून लवकर सुटका मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.











