⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

फडणवीस हे कुणामुळे मुख्यमंत्री झाले? एकनाथ खडसेंचा ‘हा’ गौप्यस्फोट वाचाच..

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात विस्तव जात नाही. खडसे बऱ्याचदा फडणवीस यांनी भाजपमध्ये आपला छळ केल्यामुळेच आपल्याला भाजपमधून जावं लागल्याचं सांगत असतात. त्याचा पुनरुच्चार एकनाथ खडसेंनी पुन्हा केला असून हा पुनरुच्चार करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हे कुणामुळे मुख्यमंत्री झाले याचा गौप्यस्फोटच केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shaha) यांच्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. तर मग कुणामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले? याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
मीडियाशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे माझ्यामुळेच मुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष व्हावे यासाठीही मी मोठी मदत केली होती. एवढं करूनही उलट त्यांनी माझा छळ केला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून त्यावर आता फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

..हे तर मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासारखं -खडसे
यावेळी खडसेंनी मराठवाड्यातील कॅबिनेटच्या बैठकीवरही टीका केली. कॅबिनेटच्या बैठकीत वेगवेगळे निर्णय होत असतात मात्र प्रत्यक्षात त्याचे व्यवस्थित रित्या अंमलबजावणी होत नाही. 2016 पूर्वी मराठवाड्यासाठी निर्णय घेतले होते. त्या निर्णयाची अद्याप पूर्तता झाली नाही. केवळ निर्णय घ्यायचे, अंमलबजावणी करायचे नाही हे म्हणजे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्यासारखं आहे. सरकारकडे पैसा नाही. सरकार रोज कर्ज काढतंय आणि आपला संसार करतंय. त्यामुळे प्रत्यक्षात सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होईल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.