⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जेव्हा एका जळगावच्या सुपुत्राला नगराध्यक्ष करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना आणलं होतं एकत्र.. !

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप। राज्यात केलेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र मध्ये एक मोठे गूढ बनुन राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे एखादी सत्ता मिळवण्यासाठी लागणारी टेक्निक आहे. ते सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतात म्हणजे नंबर गेम कसा जमवायचा हे त्यांना माहित आहे. अशा प्रकारच्या कित्येक गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या बद्दल कुतूहलाने संपूर्ण राज्यात बोलल्या जात आहेत. अशातच एक किस्सा म्हणजे एकदा जळगावच्या सुपुत्राला नगराध्यक्षपद मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काय केलं होत ? तर चक्क उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंना कधी नव्हे ते एकत्र आणलं होतं.(raj and uddhav thackrey came together due to ekanth shinde)

तो काळ आहे २०१० चा भारताला वर्ल्डकप जिंकायला अजून एक वर्ष बाकी होतं. 2009 साली लोकसभा आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फॉर्मत होती. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य असल्यामुळे काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष प्रत्येक ठिकाणी जिंकण्याची परिकाष्ट्रा करत होते. असं वातावरण देशात सुरू असताना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.

या ५० जागांसाठी निवडणूक झाली. नगर परिषदेमध्ये शिवसेनेला 14 जागा मिळाल्या. मनसेला ६ जागा मिळाल्या. अपक्षांना ७ तर भाजपा ,रिपाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांना इतर जागा मिळाल्या. आता काहीही झालं तरी शिवसेनेला अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्तेवर यायचं होतं आणि जळगावचे सुपुत्र असलेले सुनील चौधरी यांना नगराध्यक्ष करायचं होतं.(amabarnath politics)

अशावेळी ठाणे जिल्हा म्हटलं की सगळ्यांना एकनाथ शिंदे यांची आठवण येणारच. यामुळे एकनाथ शिंदे हे अंबरनाथ मध्ये शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यासाठी पुढे सरसावले. 50 पैकी केवळ 14 जागा मिळाल्या होत्या शिवसेनेला आणि मॅजिक फिगर ही 26 ची होती. यामुळे अजून ११ जागा मिळवणं महत्त्वाचं होतं. सुरुवातीला अपक्षांना सोबत घेतलं मग मनसेला सोबत घ्यायचं असं ठरवलं.(shivsena and mns together in ambarnath thane)

मात्र मनसेला सोबत घेणार कसं? उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे हा सामना संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात होताच. यामुळे जर राज ठाकरेंना सोबत घेतलं तर उद्धव ठाकरे यांना वाईट वाटणार आणि त्यांची नाराजी सहन करावी लागणार हे एकनाथ शिंदे यांना माहिती होतं. अशावेळी काय करायचं? या प्रश्नाने सर्वेच बेचैन होते. मात्र शिवसेनेसाठी आणि शिवसेनेचा भगवा हा नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मनसेची हाथ मिळवणी केली.

अपक्ष नगरसेवक ७ होते आणि मनसेच्या ६ नगरसेवकांची साथ मिळाल्यामुळे अंबरनाथ मध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आणि सुनील चौधरी हे अंबरनाथचे नगराध्यक्ष झाले.आतली गोष्ट अशी कि शिंदे यांच्या प्रेमापोटी म्हणा किव्वा धाकामुळे राष्ट्रवादीचे कित्येक नगरसेवक फ्लोर टेस्टला आलेच नाहीत.याचा फायदा देखील शिवसेनेला झाला. नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी विश्वास टाकला आणि सुनील चौधरी यांनी देखील संपूर्ण अंबरनाथ काँक्रीटचे करून स्वतः राज्याचे ‘काँक्रीट मॅन’ झाले.

जे ठाकरेंना जमलं नाही ते शिंदेंनी केल !
खरंतर ही कहाणी इथेच संपत नाही तर पुढे 2013 साली एकनाथ शिंदे यांनी असं काहीतरी करून दाखवलं जे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना करता आलं नव्हतं. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की, जेलमध्ये असल्यामुळे माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदान करता आलं नव्हतं. मात्र 2013 साली अंबरनाथ नगर परिषदेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जेव्हा सभागृहामध्ये नगरसेवकांना फ्लोअर टेस्ट साठी बोलवण्यात आलं. त्यावेळी शिवसेनेचा एक नगरसेवक हा जेलमध्ये होता. त्या नगरसेवकाला जामीन मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठे कष्ट घेतले. जामीन मिळाल्यानंतर त्या नगरसेवकांनी फ्लॉर टेस्टमध्ये भाग घेत शिवसेनेचा नगराध्यक्ष बनवून देण्यासाठी मतदान केले.