⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

आता जिल्हाभरातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत, परंतु..

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२३ । जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी देखील मान्सूनने दाखल नाहीय. ११ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. १५ जून रोजी संपूर्ण राज्य व्यापणार होता मात्र वादळामुळे मान्सून खोळंबला. दरम्यान, मान्सून लांबल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, ही बाब गृहीत धरून राज्य शासनाने पाणी कपातीचे धोरण हाती घेतले आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

तशा सूचना जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपककुमार यांनी केल्याने आता जिल्हाभरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मात्र, जळगाव शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीय.

एकीकडे मान्सून खोळंबल्याने जिल्ह्यातील काही धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा सर्वच जण बघत आहे. दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. जलप्रकल्पांमधील जलसाठा ऑगस्ट पर्यंत पुरेल या बेताने राखीव ठेवण्याचे दिले आहे.

त्यामुळे गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडताना जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायती परिषदा व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा आता विस्कळीत होणार आहे.

मात्र, जळगाव शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीय. जळगाव शहराला होणाऱ्या वाघूर धरणात जलसाठा उपल्बध असलयाने जळगावकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीय.