⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

यंदाच्या पावसाळ्यात प्रथम वाघूरचे २० दरवाजे उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. वाघूर नदीच्या उगमस्थली देखील झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी या धरणाचे प्रथम यंदाच्या पावसाळ्यात सर्व २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ४९६१८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. धरणात आणखी पाण्याची आवक वाढत असल्याने आज सकाळी धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे चाळीसगावात डोंगरी आणि तितूर नदीला पूल आला असून शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे अलीकडेच आलेल्या महापूराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. तर आज मोर मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे 3 सें. मी. उघडण्यात आले आहेत. हिवरा, अग्नावती, मंगरूळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरले आहेत.