जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक नुकसान झाले. याच दरम्यान अंगावर वीज कोसळल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात घडली आहे. शांताराम शंकर कठोरे (पुरनाड, ता. मुक्ताईनगर) व मोहित जगतसिंग पाटील (खेडगाव नंदी, ता. पाचोरा) असं मृत शेतकऱ्यांचं नाव आहे. या दु:खद घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

पहिली घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड गावात घडली. शांताराम शंकर कठोरे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. कठोरे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होते. वातावरण ढगाळ असले, तरी नियमित काम सुरू होते. अचानक जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात कठोरे यांचा जागीच मृत्यू झाला.
तर, दुसऱ्या घटनेत मोहित जगतसिंग पाटील यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. २५ वर्षीय तरूण शेतकरी हे शेतात मका लागवड करीत होते. मोहित पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी या गावातील रहिवासी होते. शेतात मका लागवड करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या दोन्ही घटनेनंतर मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.