जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक पटकावले आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताचे हे सहावे पदक ठरले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले.

कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या बजरंग पुनिया समोर कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचे आव्हान होते. बजरंगने सुरुवात सावध केली. त्यानंतर पहिला गुण मिळवला आणि त्यानंतर २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत देखील बजरंगने आक्रमक खेळ केला आणि आणखी दोन गुण मिळवत आघाडी ४-०अशी केली.
दौलतने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पण बजरंगने त्याची चाल यशस्वी होऊ दिली नाही. अखेरच्या मिनिटात बजरंग आणखी आक्रमक झाला. अखेर बजरंगने ८-२ असा विजय मिळवला.या पदकासह भारताने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधिक पदकाची बरोबरी केली आहे. याआधी भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदक जिंकली होती.