कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केलं विष प्राशन, उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केलेल्या एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान आज दि ३० जानेवारीला पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेश्वर आनंदा सावंत (वय-४५, चमगाव, ता. धरणगाव) असं मयत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर आनंदा सावंत वय-४५, वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी दि. २७ रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले.
त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि. ३० रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे.