⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

साडेतीन लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । कृषीपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळवण्याची संधी महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांकडे ५ हजार ४२२ कोटी ४४ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १८९९ कोटी १७ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल १७८९ कोटी रुपयांची माफी मिळणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.

महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांकडे ५ हजार ४२२ कोटी ४४ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १८९९ कोटी १७ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे ५ कोटी ६१ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ३५१७ कोटी ६६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १७५८ कोटी ८३ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १७५८ कोटी ८३ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. आतापर्यंत जळगाव परिमंडलातील ९६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी वीज बिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यांनी ५६ कोटी ४० लाखांचे चालू वीज बिल व ५५ कोटी ९२ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे.

या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंडमाफी, निर्लेखनाची सूट, वीज बिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण ४२१ कोटी २८ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार ९८६, धुळे जिल्ह्यातील २७ हजार ७१५ व नंदुरबार जिल्ह्यातील १६ हजार ६६७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या महाकृषी अभियान योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

१६ हजार २२६ शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे

योजनेचा लाभ घेत जळगाव परिमंडलातील १६ हजार २२६ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ८४ कोटी २५ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ११ कोटी ३५ लाख रुपये चालू वीज बिल व ५० टक्के थकबाकीचे ४२ कोटी १३ लाखांचा भरणा केला व वीज बिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे ४२ कोटी १३ लाख रुपये माफ करण्यात आले आहे.