⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

रेशन वाटपाबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..!

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२३ । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यातील एक म्हणजे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

आता ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. रेशन वाटपाबाबत मंत्रालयीन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचं वितरण होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

दरम्यान जे पात्र लाभार्थी आहेत, त्यापैकी कोणालाही अन्न धान्यापासून वंचित ठेवू नका असे आदेश चव्हाण यांनी शिधावाटप अधिकाऱ्या्ंना दिले आहेत.