⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पाचोरा, भडगाव तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्‍न सुटला; गिरणा धरणाच्या बाबतीत मोठी अपडेट

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मे २०२३ : जळगाव जिल्ह्यात एकीकडे मे हीटच्या झळा तीव्र होत असतांना दुसरीकडे पाणी टंचाईचे चटकेही जाणवू लागले आहे. सद्यःस्थितीत १३ गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. ४० गावांसाठी ४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठा असल्याने जिल्ह्याला टंचाईला सामोरे लागण्याची शक्यता आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, गिरणा धरणातून रविवारी सायंकाळी चौथे आवर्तन सोडण्यात आले. चौथे आवर्तन बिगरसिंचनासाठी असून त्याचा लाभ १०८ गावांना होणार आहे.

गिरणा धरणातून सुटलेल्या चौथ्या आवर्तनामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटणार आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. तसेच भडगाव व पाचोरा पालिका हद्दीतही या पाण्यामुळे टंचाईवर मात करता येणार आहे. चौथ्या आवर्तनामध्ये २ हजार क्यूसेस पाणी सोडले जाणार आहे. तर १४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असणार आहे. जलसंपदा विभागासोबत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत यंदा पाच आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. पाचवे आवर्तन जून महिन्यात सोडण्यात येणार आहे.

ग्रामविकासमंत्री व पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघातही पाणी-पाणी

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर तालुक्यातील सर्वाधिक चार गावांत टँकरद्वारे पाणी पुरविले जात असून, १७ गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मोरगाव, रोटवद, नेरी दिगर, किन्ही (ता. जामनेर), तळबंदतांडा, हनुमंतखेडा, खेडीढोक (ता. पारोळा), वसंतवाडी (ता. भडगाव), ऐनगाव (ता. बोदवड), पिंपळगाव (ता. चाळीसगाव), रामेश्वर (ता. पाचोरा), कंडारी, कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) या गावांना १४ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. हातगाव, लोणवाडी बुद्रुक येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील आठ गावांमध्ये नऊ, पारोळा तालुक्यातील तीन, पाचोरा तालुक्यात चार विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव तालुक्यालाही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत.

जिल्ह्यात २६ लघु प्रकल्प असून, त्यातील १३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. यात हातगाव-१, खडकेसीम, पिंप्री, वाघळा-१, ब्राह्मणशेवगा, पिंपरखेड, कुंझर, वाघळा-२, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळीभोरस, पथराड, कृष्णापुरी, निसर्डी, आर्डी, म्हसवा, कंकराज, शिरसमणी, पिंपळकोठा भोला, सावरखेडा, बोळा, मन्यारखेडा, विटनेर, पद्मालय, खडकेसीम यांचा समावेश आहे. गतवर्षी लघु प्रकल्पांमध्ये ६.०१ टक्के साठा होता. तो सद्यःस्थितीत अवघा एक टक्का आहे.