⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पुढचे तीन महिने तापदायक ! उन्हाच्या चटक्यासह महागाईचाही बसेल चटका? वाचा काय आहे..

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचलाय. मार्च महिन्यात जे तापमानाची नोंद होते ते यंदा फेब्रुवारीतच झाली. त्यामुळे यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या 147 वर्षातला सर्वात उष्ण महिना ठरलाय. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन महिने देखील असेच तापदायक राहतील असा अंदाज वर्तविला आहे. वाढत्या तापमानाचा फटका महागाईवर देखील होण्याची शक्यता आहे.

ला निनानंतर वाढत चाललेला अल निनोचा प्रभाव पाहता 2023 वर्ष सुद्धा उष्ण लहरींचे आणि अधिक तापमानवाढीचे राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटा आणि दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्याचं कमी होणारं प्रमाण चिंतेचा विषय ठरु शकतो.

इतकंच नव्हे तर वाढत्या तापमानाचा फटका पिकांना देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न होत असताना महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. 

यंदा देशातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच तापमानाचा पारा 40 जवळ पोहोचला होता. महाराष्ट्रातील देखील अनेक जिल्ह्याचा पारा 35 वर गेला होता. त्यामुळे दुपारनंतर उन्हाचे चटके बसत होते. मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही होणार आहे.राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागच्या वर्षी विदर्भ, मराठवाड्यात अनेकदा उष्णतेच्या लाटा बघायला मिळाल्या. ज्यात अधिक तापमान आणि उषाणतेच्या लाटा उन्हाळ्यातील 120 दिवसांपैकी 30 दिवस होत्या. हा गेल्या 50 वर्षातला विक्रम होता. त्यामुळे यंदा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास उन्हाचे चटके अधिक प्रमाणात सहन करावे लागणार आहेत. 1877 साली फेब्रुवारीत सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आली होती, त्यानंतर फेब्रुवारी 2023 हा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरलाय. घटलेली चक्रीवादळांची संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस ही फेब्रुवारीतील उष्णतेची प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय.

एकीकडे मार्चमध्ये काढणीला आलेल्या पिकांवर उष्णतेच्या माऱ्यामुळे होरपळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अल निनोचाप्रभाव वाढत असल्यानं यंदा दुष्काळाची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे एकीकडे वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटा आणि दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्याचं कमी होणारं प्रमाण चिंतेचा विषय ठरु शकतो.