⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियम बदलले, आता लागणार ‘ही’ कागदपत्रे

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली असून तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही खूप उपयुक्त बातमी आहे. सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियम बदलले आहेत. पीएम किसान योजनेत होणाऱ्या फसवणुकीसाठी सरकारने रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. आता शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह शिधापत्रिका द्यावी लागणार आहे. त्याशिवाय हप्ता मिळणार नाही.

रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

आता द्यावी लागणार ‘ही’ कागदपत्रे
जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आता आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

‘या’ तारखेला येईल हप्ता
सरकारने पीएम किसान (पीएम किसान सन्मान निधी योजना) योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत आगाऊ नोंदणी करावी जेणेकरून त्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ घेता येईल. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.

दरवर्षी शेतकऱ्यांना मिळतात ६ हजार रुपये
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.