जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२६ । जळगावच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी मात्र जळगावकरांना उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याचा सामना करावाच लागत आहे. सोमवारी ४०.९ अंशांवर असलेला पारा मंगळवारी ४०.४ अंशांवर स्थिरावला आहे. दरम्यान, हवामान खात्याने ८ मेपर्यंत उष्णतेची लाट तीव्र राहण्याचा इशारा दिला आहे.

जळगावचे तापमान पुढील तीन दिवसांत थेट ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, ताशी १५ ते ३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे आर्द्रता २५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. त्यामुळे आगामी दिवसांत सूर्याचा प्रकोप आणखी वाढणार असून नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

पुढील ३ दिवस उष्णतेची लाट तीव्र राहणार असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
९ मे नंतर अवकाळी पावसाचे संकेत
दरम्यान, एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे मात्र ९ मे नंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. सातपुडा पर्वताच्या जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात, विशेषतः रावेर आणि मुक्ताईनगर पट्ट्यात ९ मे नंतर अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळे या भागात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.







