⁠ 
सोमवार, मे 6, 2024

आमदारांकडून कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न – उपमहापौर कुलभुषण पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ ।  पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भोईटे नगर रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्यांचे बोर्ड पिंप्राळ्यात लावण्यात आले असून या बोर्डवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ना.गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, आ. राजुमामा भोळे यांचे नावे टाकण्यात आले असून महापौर, उपमहापौर, आयुक्तांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यावरुन उपमहापौर यांनी आ.राजुमामा भोळे हे सदर कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे.


जळगाव महापालिकेला शासनाकडून दि. १६ ऑगस्ट २०१८ रोजी शंभर कोटीच्या निधी मंजुर झाला. त्यापैकी ३८ कोटीचा निधी खर्चाची मान्यता मिळाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत हा निधी मंजुर झाला असून यात ३० टक्के हिस्सा हा मनपास अदा करावा लागणार आहे. सदरील रस्त्याच्या निधीच्या संदर्भात पीडब्ल्यूडी विभाग यांच्याकडेस १५ कामांना तांत्रिक मंजुरी मिळणे करीता मनपाने दि. २२ जुलै २०१९ रोजी १९ लक्ष रुपये फी भरली तेव्हा तांत्रीक मान्यता मिळाली. त्यानुसार निविदा प्रक्रीया झाली.

दि. १५ मे २०२१ अन्वये महासभा ठराव क्रं. ५२२ नुसार तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राव्दारे रस्त्यांचे काम जलदगतीने होणेसाठी विनंती केली होती.त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास विभागातील अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष ९ कोटींचा निधी प्राप्त झाला व मनपा हिश्याचा ५ कोटींचा निधी मनपाने पीडब्ल्यूडीला दिल्यामुळे प्रत्यक्ष सुरु झाली. या सर्व प्रक्रीयेमध्ये आ. राजुमामा भोळे यांचा कुठलाही सहभाग व पाठपुरावा नसतांना त्या रस्त्यांवर त्यांच्या नावाचे फलक लावुन श्रेय घेऊ पाहात असल्याचा आरोप उपमहापौर यांनी केला आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यांच्याच मुख्यमंत्र्यांनी त्या निधीला स्थगिती दिली होती. मात्र आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर आम्ही तो निधी आणला असा पलटवार आ. राजुमामा भोळे यांनी केला. तसेच मनपा त्यांचा हिस्सा देत असेल तर ते मनपाचे कर्तव्यच आहे. नागरिक मनपाला कर भरतात त्याबदल्यात त्यांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपाची असल्याचे देखील ते म्हणाले.