⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Maharashtra Updates : एकनाथ शिंदेंकडून शिवसेना हायजॅक, शिंदे गटाकडे ४७ ते ठाकरेंकडे १४ आमदार

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) गटाचे तुल्यबळ वाढतच चालले आहे. विधानसभेत एखादा वेगळा गट स्थापन करण्यासाठी आवश्यकता असलेली मॅजिक फिगर गाठण्यात एकनाथ शिंदे यांना जवळपास यश आले आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन मिळाले असून आता खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, नुकतेच हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४१ आणि अपक्ष ६ असे ४७ आमदार तर उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ १४ आमदार राहिले आहेत. शिंदे यांच्याकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारावर ते राज्यपालांकडे वेळ मागू शकतात आणि भाजपच्या पाठिंब्याचे पत्र देऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोड सध्या महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून पहिल्या दिवशी विधान परिषद निवडणूक पार पडताच शिंदे ११ आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाले होते. एकनाथ शिंदे हे अहमदाबादमार्गे सुरत येथील ला मेरिडियन हॉटेलला पोहचले होते. शिंदे गटाकडे सुरुवातीला ११ आमदार असल्याचे सांगण्यात येत होते पण सायंकाळपर्यंत हा आकडा २५ वर गेला होता. रात्री ला मेरिडियन हॉटेल सोडताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचा फोटोच त्यांनी प्रसार माध्यमांना दिला होता. शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता राज्यात शिवसेना आणि महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरु झाले होते.

एकनाथ शिंदे यांच्याकडे ४६ आमदार असल्याचे काल खुद्द शिंदे यांनीच सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर आणि पाठक यांना त्यांची समजूत काढण्यासाठी पाठविले होते मात्र तरीही त्या चर्चेचे काहीही फलीत निघाले नव्हते. सुरत येथून निघाल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सर्व आमदार बुधवारी गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये पोहचले होते. गुरुवारी समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे ४१ आमदार शिंदे गटाकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचाच अर्थ दोन तृतीआंश आकड्यापेक्षा जास्त आमदार हे शिंदे गटात आहेत, हे स्पष्ट होतंय. तसेच ६ अपक्ष आमदार देखील शिंदे यांच्याकडे आहेत. तर आता उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे १४ आमदार शिल्लक उरले आहेत. यामुळे अख्खीच्या अख्खी शिवसेनाच आता एकनाश शिंदे यांच्याकडे आल्याचे दिसत आहे. जवळपास सर्व शिवसेना फुटल्याने एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
हे देखील वाचा : गुलाबराव तुम्ही आम्हाला घाबरवले होते : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत ..तर मी राजीनामा देण्यास तयार आहे असे म्हटले होते. तसेच सायंकाळी त्यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर आपला रहिवासी हलविला होता. मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत, गेल्या अडीच वर्षात महा विकास आघाडीच्या सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. याच बरोबर घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण करण्यात आले. अशावेळी पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी नैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असून महाराष्ट्रासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असे ट्विट शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.