⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दुर्दैवी : १५ फेब्रुवारीला सरपंचपदी निवड अन् १५ मार्चला अपघाती निधन !

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । धरणगाव तालुक्यातील जांभोऱ्याचे १५ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त सरपंच विशाल प्रकाश चव्हाण यांचा १५ मार्च रोजी अपघाती निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

विशाल प्रकाश चव्हाण यांना १५ तारीख शुभ ठरल्यामुळे ते १५ फेब्रुवारी रोजी जांभोरा ग्रामपंचायतींचे सरपंचपदी बिनविरोध निवडून आले आणि १५ मार्च या तारखेला रात्री ११:३५ वाजेच्या सुमारास त्यांचे अपघाती निधन झाले. असा हा विचित्र योगायोग व असा हा शुभ व अशुभ घटनांचा क्रम सर्वांना अवाक करणारा ठरला आहे.

विशाल प्रकाश चव्हाण हे चारचाकी वाहनाने पाचोरा येथे त्यांच्या भावाला घ्यायला गेले असता त्यांच्या गाडीचे खडके सिम गावाजवळ पेट्रोल संपले.  त्यामुळे ते गाडीतून बाहेर आले असता मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एम.एच.१८ ए. ए.५१२०) क्रमांकाच्या पीक अप गाडीने धडक दिली. त्यात विशाल प्रकाश चव्हाण यांचा करुण अंत झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ते युवा सेना उप तालुका प्रमुख म्हणुन काम पाहत होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जांभोरा परिसरात शिवसेनेचे मजबूत संघटन उभारण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, तीन वर्षाची एक मुलगी व नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी असा परिवार आहे.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला पीक अप गाडी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम प्रकाश चव्हाण यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग ५ गु.र. नं.३९/२१ भादवी कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८ मो. व्हे.ॲक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र तायडे, संदिप सातपुते व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.