जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या आजच्या सामना (Samana) अग्रलेखातून भाजप सरकारचे ईडी आणि सीबीआयच्या छापेमारीप्रकरणी सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला. देशात अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला. असं अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजप सरकारमुळे देशातील स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली असल्याने जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. ज्या भाजपने देशात अनेक ठिकाणी ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अनेक राज्यातील राजकीय परिस्थिती ढळमळीत करणाऱ्या भाजपच्या ऑपरेशन लोटस म्हणून जे चालवले जाते त्यामुळे विष्णूचे आवडते फूल बदनाम झाले असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?
‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ‘‘ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.’’ महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दिल्ली सरकारचे मद्य धोरण, त्यांची अबकारी नीती, त्यांनी मद्यविव्रेत्यांना दिलेले ठेके हा भाजपच्या दृष्टीने टीकेचा विषय असेल, पण तो निर्णय व्यक्तिगत नव्हता, तर संपूर्ण सरकारचा होता व त्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांचाही समावेश असतो, पण ‘कॅबिनेट’च्या निर्णयाचे खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर फोडून त्यांच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या. त्यांना या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले व हे प्रकरण आता ईडीकडे, म्हणजे भाजपच्या विशेष शाखेकडे सुपूर्द केले. मनीष सिसोदियांवर अटकेची टांगती तलवार आहे. सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत, पण एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली गेली. म्हणूनच देशाची स्थिती संभ्रमित आहे, असे श्री. पवार म्हणतात ते खरे आहे. हे सर्व केजरीवाल यांचे सरकार पाडण्यासाठी सुरू आहे. आता श्री. मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला आहे. ‘‘भाजपमध्ये प्रवेश करा, अशी टीकाही करण्यात आलीय.












