⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

प्रिय मित्र देवेंद्र.. ; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, नेमकं काय म्हटलं आहे पत्रात?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने फुंकलेलं असताना तसेच प्रचाराला देखील सुरुवात आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. 

एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे. राज ठाकरेंच्या पत्राला फडणवीसांनी प्रतिसाद दिला तर तोच इतिहास कायम राहू शकतो. आज सकाळीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे यांनी फडणवीसांना हे पत्र लिहिलंय.

image 7
प्रिय मित्र देवेंद्र.. ; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, नेमकं काय म्हटलं आहे पत्रात? 1

राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य….
प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीन आमदार होण्यानं के. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.

आपला मित्र
राज ठाकरे