जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असून त्यातच आता मसाले, खाद्यतेल, तूरडाळ आणि इतर किराणा मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांत अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या होळी, रमजान आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मात्र याच काळात किराणा मालाच्या दरात मोठी वाढ झाली. यामध्ये लाल मिरची, धणे, जिरे, हळद, लवंग, मिरे यांसारख्या मसाल्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही मसाल्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते दोनशे रुपयांनी वाढल्याचे दिसून येते. उत्पादन घट, वाहतूक खर्चात वाढ आणि वाढती मागणी ही दरवाढीमागील प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.

खाद्यतेल व डाळींचीही वाढ
तूरडाळ, हरभरा डाळ तसेच सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारात त्याचा थेट परिणाम जाणवत आहे. लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात जेवणावळी होत असल्याने डाळी व तेलाची मागणी वाढली आहे.

दरवाढीमुळे लग्नसमारंभाचे आयोजन करणाऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. केटरिंग दरात वाढ झाली असून प्रति ताट दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याचे समजते. दरवाढीमुळे ग्राहकांना “स्वस्त काय?” हा प्रश्न पडला आहे. काही भाजीपाला आणि स्थानिक हंगामी पिके तुलनेने स्थिर दरात उपलब्ध असली तरी किराणा आणि मसाल्यांवरील वाढीमुळे एकूणच घरखर्च वाढला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर दर काही प्रमाणात स्थिर होतील. मात्र जागतिक बाजारातील परिस्थिती आणि स्थानिक उत्पादन यावर पुढील दर अवलंबून असतील. मात्र सध्याच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत असून आगामी काळात दर कमी होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे आहेत दर?
विलायची- ३४०
शहाजिरा -१५०
लवंग -१५०
मिरे- १७०
जिरे -३१०
मिरची – ४०० (किलो), पंधरा दिवसापूर्वी ३४० रुपये किलो
खाद्यतेल – १५० ते १६० रुपये प्रति किलो
तूर डाळ- १२५ ते १३०







