⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सौर कृषी पंप मिळवायचाय…असा करा अर्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान उर्जा व उत्थान महा अभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरु केली आहे. ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर घ्यावयाचा आहे अशा शेतकऱ्यांनी  https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाउर्जा) च्यावतीने करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल.

अर्ज कुठे करायचा?
पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं उद्दीष्ठ आहे. महाराष्ट्रात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या https://kusum.maharurja.com/solar/befeficiary/register/Kusum-Yojana-Component-B या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत, बँक खाते पासबूक झेरॉक्स लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 टक्के खर्च करावा लागेल. एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांसाठी 5 टक्के खर्च करणं आवश्यक आहे. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडं पारंपारिक वीज कनेक्शन नसावं. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले मात्र मंजूर न झालेले शेतकरी अर्ज करु शकतात.

कुसुम योजनेची सुरुवात कधी झाली?
कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. भारतातील मोसमी पाऊस, वीजेची कमतरता, जलसिंचन सुविधांच्या कमतरतांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं कुसुम योजना आणली होती. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताना दिली होती.

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये
1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.
3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील.
4. सौर उर्जा प्लाँट पडीक जमीनवर लावता येईल.

ग्रीड बनवून कंपनीला वीज देऊनही फायदा
कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात.यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.