जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । पारोळा शहराचे भूषण असलेला भुईकोट किल्ला खूपच दयनीय स्थितीत पोहचला आहे. किल्ल्यावर सर्वत्र गवत, काटेरी झुडपे उगवलेली आहेत. तटबंदी च्या चारही बाजूने तटबंदीला धोकादायक वृक्ष वाढलेले असून यावर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पूर्वजांचा हा अनमोल ठेवा काळाच्या ओघात नष्ट होऊन जाईल. यावर कळस म्हणजे शहरातील नागरिक किल्ल्याचा वापर प्रातर्विधीसाठी करतात ही खूपच मोठी शोकांतिका आहे.

किल्ल्याची ही दुरावस्था दूर करण्यासाठी शहरातील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, किसान महाविद्यालय व धरणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी नगरपालिका पारोळा शहरातील आय.एम.ए.चे सदस्य विविध मान्यवर यांना एकत्र आणून श्रीराम नवमीच्या दिवशी राजा शिवछत्रपती परिवार जळगाव विभागाने मोहिमेचे आयोजन केले आहे. सदर मोहिमेत धुळे व अहमदनगर जिल्ह्यातील परिवाराचे मावळे सुद्धा सहभागी होणार आहेत. तरी या मोहिमेत सर्वानी उपस्थिती द्यावी व शिवकार्यास हातभार लावावा असे आवाहन परिवाराचे संपर्क प्रमुख डॉ. गोपाळ पाटील व डॉ.मनीष यांनी केले आहे.