जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख निर्माण करण्यासाठी मोदी सरकारने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला. मोदी सरकारची ही आठ वर्षे गोरगरीबांना समर्पित आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. मनोज कोटक, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय आदी यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात आधुनिक, सामर्थ्यशाली, समृद्ध नव भारताची पायाभरणी झाली, असेही ते म्हणाले.
श्री. शिंदे म्हणाले की, आठ वर्षापूर्वी देशात भ्रष्टाचाराचे साम्राज्य तयार झाले होते. लोककल्याणाच्या योजनांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मे २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलू लागले. एकात्म मानववाद, अंत्योदयाचा विचार सत्तेचा आत्मा आहे हे ध्यानात ठेवून मोदी सरकारने सामान्य माणसासाठी अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे गोरगरिबांपर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहचू शकले. या लोककल्याणकारी योजनांमुळेच देशाच्या विकासाला गती मिळाली. यातूनच नवा भारत उदयास येत आहे. कोरोना काळात मोदी सरकारने आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये केले. भारताला पोलिओ व इतर अनेक संसर्गजन्य आजारांची लस आयात करावी लागली आहे. याच भारताने कोरोना काळामध्ये दोन लसींची निर्मिती करून संपूर्ण जगभरात त्याचा पुरवठा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या मोदी सरकारच्या धोरणामुळे देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले. द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गांचे जाळे देशभर उभारले जात आहे. जन-धन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय बांधणे, उज्वला योजना यातून गोरगरीबांच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. किसान सन्माननिधी, पीक विमा योजना यातून शेतकऱ्यांचा विकास साधला. मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत या योजनांतून औद्योगिक विकासाची गती वाढत आहे.