⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

निर्लज्ज, फुटीरवादी, फालतू, बिकाऊ आमदार ७ वाजले कि थरथरायला लागतात : आदित्य ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२१२ । आसाममध्ये प्रचंड पूर आला असून लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसामचे मुख्यमंत्री मदतीसाठी विनंती करीत आहे. आसाममध्ये प्रचंड खळबळ असून निर्लज्ज, फुटीरवादी, फालतू, बिकाऊ आमदार दररोज त्याठिकाणी आनंद साजरा करीत आहे. आसामच्या जनतेशी त्यांना काही देणे घेणे राहिले नाही. सकाळी आरामात उठायचे, दिवसभर मजा करायची, रात्री नाचगाणे करायचे असे त्यांचे कार्य सुरु आहे. फुटीरवाद्यांच्या खाण्यावर दररोज ८ लाख रुपये खर्च होत आहे. काही आमदार तर असे आहेत कि सायंकाळी ७ वाजले कि थरथरायला लागतात, असा घणाघाती टोला शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.

कर्जत येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी आज बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, मी बंडखोरांना विचारणार आहे, उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी काय कमी केले? हिम्मत असेल तर समोर या, राजीनामा द्या आणि निवडणुकीला उभे रहा. जर तुम्हाला हरवले नाही तर आदित्य नाव नाही. स्वतःला विकून गेलेले आमदार ५० कोटींची बोली लावून गेले आहे. आम्ही अनेकांना मदत केली, निधी दिला तेव्हा हेच आमदार, खासदार आम्हाला रोखत होते. स्व.बाळासाहेबांनी एक ब्रीदवाक्य दिले आहे. पैसा येतो, पैसा जातो पण नाव गेले कि परत येत नाही. इतिहास सांगतो, आजवर ज्यांनी बंड केले ते पुढे टिकले नाही. मी आजही सांगतो समोर या, उद्धव साहेबांची माफी मागा आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी उभे रहा. फुटीरवादीच राहायचे असेल तर तुम्हाला अपात्र केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील अनेक आमदारांचे वागणे चुकीचे होते परंतु त्यांना सांभाळून घेतले पण आज ते आपल्यात राहिले नाही. आज राज्यात अनेक मंत्री हरवले आहेत. परिवहन मंत्री हरवले, कृषी मंत्री हरवले, पाणी पुरवठा मंत्री हरवले अशी आज स्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनीच घात केला. समोर येऊन कुणीही बोलत नाही. आज तिकडे गेलेल्या आमदारांपैकी अनेकांना बळजबरीने नेण्यात आले, काहींचे अपहरण झाले. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना कुणाचा पाठिंबा आहे हे माहिती नाही. बहुदा मी पुन्हा येईल, पुन्हा येईल असे सांगणारे असावे असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. आज हिंदुत्वाची भाषा करीत मोठे पत्र पाठविणारे दीपक केसरकर स्वतः. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी शिवसेनेत आले आहेत आणि आज गुवाहाटीला राहून हिंदुत्वाची भाषा करीत आहे.

शिवसेनेने अनेकांना मोठे केले. सायकलवाला मोठा झाला, टपरीवाला मंत्री झाला. कुणालाही कधी कमी पडू दिले नाही. अनेक आमदार आज आमच्या संपर्कात आहेत. काही आज इकडे होते तर दुसऱ्याची दिवशी गुवाहाटीला दिसू लागले. गुलाबराव पाटलांना मी त्या दिवशी माझ्या गाडीत बसण्यास सांगितले असता ते भीत भीत गाडीत बसले. मी बोललो, घाबरू नका, ते काही तुम्हाला इकडे येऊन घेऊन जाणार नाही. गुलाबराव गाडीत बसले तेव्हा थरथरत होते. माझा एक कार्यकर्ता म्हणाला कि, सायंकाळी ७ वाजले कि त्यांचे हात थरथरायला लागतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता असून नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे जवळपास ५० आमदार घेऊन गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये थांबून बंडखोरांना आज ५ दिवस झाले आहे. कर्जत येथे शिवसेना मेळावा घेत सोमवारी आदित्य ठाकरे यांनी अनेकांवर निशाणा साधला. आमदारांची बोली लागली, मोठमोठ्या ऑफर देण्यात आल्या आणि ते विकले गेले. गुवाहाटीला असलेला काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला ते सर्व सांगत असतात. मी पण ऑफरची वाट पाहत होतो पण मला विचारायची कुणाची हिम्मत झाली नाही. स्व.बाळासाहेबांचे रक्त असल्याने हे विकले जाणार नाही हे त्यांना माहिती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.