जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने मोठा राजकीय वाद पेटला आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन विरोधकांकडून शिंदे-भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकल्पावरून विरोधकांचा चौफेर हल्ला होत असतानाच वेदांता प्रकल्प कुणामुळे गेला आणि का गेला? याबाबत शिंदे गटातील आमदार मोठा गौप्यस्फोट करणार आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. वेदांता प्रकल्प कुणामुळे गेला आणि का गेला? याचा लवकरच खुलासा करणार असल्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. शिरसाट यांचा रोख विरोधकांवर असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वेदांताचा प्रकल्प खराब पायाच्या मागच्या सरकारमुळे गेला. हा प्रकल्प उद्धव ठाकरेंमुळे गेला. आम्हाला तर येऊन दोन महिनेच झालेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत, असं सांगतानाच या सर्व प्रकाराला आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई जबाबदार आहेत. हा प्रकल्प कुणामुळे गेला त्यांची नावे लवकरच जाहीर करणार आहे. अडीच वर्षात या प्रकल्पाला घालवण्यात कुणाचा हात होता ते देखील सांगू, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कान टवकारले आहेत.