जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२५ । आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचे दंड थोपटले आहे. आपण युतीच्या नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचा दावा आमदार किशोर पाटलांनी केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले किशोर पाटील?
जे सातत्याने आपल्या विरोधात लढले अशांच्या सोबत युती करणार का? असा सवाल करत शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात आमची शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केले. ‘आगामी काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढण्याच्या बाबत महायुतीचे नेते सांगत असले तरी आजपर्यंत जे आपल्याविरोधात लढले ते पुन्हा एकदा आपल्या विरोधात एकत्र येऊन आपला पराभव कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत, अशांसोबत आपण युती कशी करणार? ‘, असा सवाल किशोर पाटील यांनी उपस्थित केला.

तसंच ‘आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघात आपण महायुती नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार आहोत आणि त्यामध्ये आपला शिवसेनेचा भगवा झेंडा विजयी झालेला दिसेल.’, अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केले. किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे राज्यात महायुतीमध्ये पुढील काळात काय चित्र राहू शकते याचा अंदाज या घटनेवरून येत आहे.










