शेतकऱ्यांचं अवकाळीने वाढवलं आणखी टेन्शन; पुढचे ४ दिवस ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचे

मार्च 22, 2023 10:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२३ । मागील काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केलं आहे. राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल, असा आशावाद निर्माण झालेला असताना आता पुढील ४ दिवस राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

mansoon rain jpg webp

त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचं अवकाळीने आणखीच टेन्शन वाढवलं आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच गारपीटीने तडाखा दिल्याने रब्बी हंगामातील पिकांची नासधूस झाली आहे. वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल मातीत गेल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहेत. त्यातच आता हवामान खात्याने पुढील चार दिवस म्हणजे शनिवार, २५ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पाऊस पडू शकेल. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील चार दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या अवकाळी पावसामुळे अचानक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्यात चिंततेचे वातावरण तयार झाले आहे. या नुकसानीस अनुसरून शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now