जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज हवामान खात्यानं उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर,रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, परभणी, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारपासून जळगाव जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे. जिल्ह्यात काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. परंतु गेल्या एक-दोन दिवसापासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचे पुरागमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झालाय. उद्या जिल्ह्याला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. या दरम्यान, जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.