⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अमळनेरात वीजचोरी करणाऱ्या ३०१ जणांवर महावितरण कर्मचाऱ्यांची धडक कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । अमळनेर तालुक्यातील महावितरणतर्फे १ व २ ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागात राबवलेल्या मोहिमेत वीजचोरी करणाऱ्या ३०१ जणांवर विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ३०१ मीटरमधून वीजचोरी पकडून वीजचोरीचे साहित्य तसेच मीटर जप्त केले.

महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार सीताराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी ही धडक मोहीम राबवली. यावेळी ३०१ जणांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरी करणाऱ्या नागरिकांना दोन दिवसात दंडाचे देयक भरण्याचे सांगण्यात आले आहे. दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. वीजचोरीविरुद्ध राबविलेल्या पथकात धरणगाव विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा समावेश होता. यापुढे वीजचोरीप्रकरणी रोज कारवाई करण्यात असल्याचे कार्यकारी अभियंता पवार यांनी सांगितले. वीज ग्राहकांनी वीजचोरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले.