Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल

जानेवारी 14, 2025 4:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मकरसंक्रांतीचा सण एक दिवसावर असताना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे. लीलाधर कौतिक पाटील (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

liladhar patil

लीलाधर पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह कुसुंबा गावात वास्तव्याला होते. शेती आणि मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपासून लीलाधर पाटील यांच्या हातांना काम नव्हते. तसेच त्यांनी खासगी कर्जही काढले होते. शिवाय शेतीतून उत्पन्न न आल्यामुळे कर्जफेडीची चिंता होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते.

घरात कोणी नसताना घेतला गळफास
दरम्यान रविवारी त्यांच्या पत्नी सविता गावी गेल्या होत्या. तर त्यांचा ११ वर्षीय मुलगा चेतन हा बाहेर गेला होता. यामुळे लीलाधर पाटील घरात एकटेच होते. याच वेळी त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेचारला त्यांचा मुलगा चेतन हा घरात आला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तो आक्रोश करीत घराशेजारी राहणाऱ्या काकांकडे आला व घटना सांगितली.

परिवाराचा आक्रोश
नातेवाइकांनी त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक गफूर तडवी तपास करीत आहेत. त्यांच्या मागे आई निर्मला, दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी सविता, मुलगा चेतन आणि मुलगी प्रांजल असा परिवार आहे. घरातील कमावता पुरुष गेल्याने परिवार संकटात सापडला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now