⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जामनेर तालुक्यात हाहाकार : चक्रीवादळाने उडाले पत्रे, तलाव फुटला, गावात पाणीच पाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । जामनेर तालुक्यात आणि कांग नदीच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक गावांना चक्रीवादळासह मुसळधार पावसाला सामोरे जावे लागले आहे. अनेक गावात मोठे नुकसान झाले असून २ लोक वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

चाळीसगाव तालुक्यानंतर जामनेर तालुक्याला देखील अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे तळेगाव, भागदरा, तोंडापूर, ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

टाकरखेडा-ओझर पुलावरून सकाळी मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते. दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने मदतकार्यात देखील अडथळा निर्माण होत होता. तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघ गावाचा संपर्क तुटला असून यावेळी गावातील दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

जामनेर तालुक्यातील ओझरमध्ये सोमवार रोजी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळसह अतिवृष्टी झाली. यामध्ये गावातील सुमारे ९० टक्के घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. काही ठिकाणी बैल देखील जखमी झाले आहे.

दरम्यान, भागदरा या गावाजवळील गाव तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. तहसीलदार आणि शासन अधिकारी गावात भेट देऊन पाहणी करीत असून नुकसानीचा आढावा घेत आहेत. जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन यांनी देखील नगरसेवकांनासोबत घेऊन गावांत व शेतात जाऊन पाहणी केली. तात्काळ संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.