जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने जळगावसह राज्यात गारठा वाढला आहे. ७ डिसेंबर रोजी जळगावचे रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअस होते, मात्र दुसऱ्याच दिवशी, सोमवार ३ अंशांची मोठी घट झाल्यामुळे रात्रीचा पारा थेट ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यामुळे जळगावकरांना हुडहुडी थंडी जाणवत आहे.

मागच्या काही दिवसापासून जळगावचे किमान तापमान १२ अंशाच्या वर कायम होता. तरी रात्री आणि सकाळच्या वेळेस कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र दुपारनंतर उन्हाचा उकाडा जाणवत होता. काल सोमवारी किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत इतके होता. तर कमाल तापमान २८ अंशापर्यंत होते. सध्या उत्तरेकडील शीत लहरींमुळे जळगावात कडाक्याची थंडी पडली आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात आगामी १५ दिवस रात्रीचे तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. डिसेंबर महिना पूर्णपणे कोरड्या हवामानाचा राहणार असल्याने, या महिन्याभरात जिल्ह्यात एक ते दोन वेळा थंडीची लाट येण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कडाक्याच्या थंडीचा या पिकांना मोठा फायदा
या कडाक्याच्या थंडीचा रब्बी पिकांना, विशेषतः हरभरा आणि गहू या पिकांना मोठा फायदा होत आहे. गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे या पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, यंदा कोरड्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा व गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी समाधानी आहेत.







