जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने सध्या विश्रांती घेतली असून वातावरण पुन्हा उष्णतेकडे झुकू लागले आहे. काही दिवस मिळालेला गारव्याचा दिलासा आता कमी होत असून नागरिकांना पुन्हा उन्हाचा चटका आणि वाढता उकाडा जाणवू लागला आहे. आगामी तीन दिवसांत तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली होती आणि जळगावकरांना उन्हाच्या तडाख्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा तात्पुरता ठरला असून आता आकाश निरभ्र होत असल्याने तापमान पुन्हा वाढू लागले आहे.

७ ते १० एप्रिल या कालावधीत वातावरण प्रामुख्याने स्वच्छ आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान दिवसाचे तापमान सुरुवातीला सुमारे ३६ अंशांच्या आसपास राहून हळूहळू वाढत ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्रीचे तापमान १९ ते २१ अंशांदरम्यान स्थिर राहणार असल्याने रात्रीच्या वेळी काही प्रमाणात गारवा जाणवेल.
तथापि, १० एप्रिलनंतर उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. उत्तर भारतात ७ एप्रिलपासून नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत असला तरी त्याचा जळगाव जिल्ह्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. एकूणच, हा आठवडा हवामानाच्या दृष्टीने शांत आणि स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.









