जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत. रात्री आणि पहाटेच्या तापमानातही वाढ झाली झाल्याने थंडीचा गारवा आता गायब होऊन उकाडा जाणवू लागला आहे. शुक्रवारी काहीसे ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाल्याने जळगावकर त्रस्त झाले. संध्याकाळी मात्र वाऱ्याचा वेग वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला.

दरम्यान, जळगावमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभर ऊन, तर रात्री आणि पहाटे गारवा असे संमिश्र वातावरण जळगावकर अनुभवत होते. मात्र, मागच्या काही दिवसात तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.

या आठवड्यातील मागच्या चार दिवसात जळगावातील कमाल व किमान तापमानात तीन ते चार अंशापर्यंतची वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. २०) जळगावचे किमान तापमान १८.५ तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यंदा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच किमान तापमानाने १८ अंशांचा टप्पा ओलांडला असल्याचे चित्र आहे.त्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला असून उकाड्यात वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाले आहे.

सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे





