जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या उन्हाचा चटका वाढत आहे. तापमान वाढीमुळे जळगावकरांना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच कमाल तापमान ३८शीच्या घरात पोहोचले असून पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच जळगावचा पारा ४२ अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे उष्णतेचा तडाखा जळगावकरांना जाणवणार आहेत.

फेब्रुवारीच्या अखेरीस जळगावातील थंडी पूर्णपणे ओसरली असून दुपारच्या उकाड्यामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. पुढील दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके होते. तर किमान तापमान १५.६ अंश इतके होते. दरम्यान किमान तापमान कमी असले तरी रात्रीच्या वेळेस उकाडा जाणवत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ५ ते १५ मार्च दरम्यान जिल्ह्याचा पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे आणि उष्माघात टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत तर पश्चिम भारतावर उच्च – दाबाचा हवेचा पट्टा मजबूत होत आहे. यामुळे हवा दाबली जाते आणि गरम होते. ही उष्ण हवा राजस्थान आणि गुजरातमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने उष्णतेची लाट जाणवू शकते, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.







