⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

जळगावकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात दाटलेले अवकाळीचे ढग कमी होऊन, जिल्ह्यात आता उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा(Jalgaon Tempreture) पारा ४२ अंशावर गेला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान ४० अंशाच्या वर गेल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचा अनुभव येत आहे.

या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे. यासह आगामी दोन ते तीन दिवस तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेच्या काळात दुपारच्या वेळेस महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर निघणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुजरात व राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढवला आहे. त्यात एकीकडे तापमानात वाढ वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील कायम असल्याने उष्ण झळांसोबतच उकाडाही जाणवतोय.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहचला होता. मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यावर अवकाळी ढग आल्याने तापमानात घट होऊन तापमान ३७ अंशावर आले होते. त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. हवेत देखील गारवा निर्माण झाला होता. मात्र सूर्याने पुन्हा एकदा आग ओकण्यास सुरवात केल्याची अनुभूती येत आहे.

मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. आगामी दोन दिवस तापमानाचा जोर असाच राहण्याची शक्यता असून दोन दिवसात तापमान ४३ अंशाच्या वर जाण्याची शक्यता देखील वळविली जात आहे. कडक उन्हाचा जनजीवनावर परिणाम होत असून, दुपारी शहरातील वाहतूक काहीशी मंदावलेली असते.