जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या लहरी मंदावल्या असून थंडीची लाट ओसरलेली पाहायला मिळते आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात गारठा कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, काही ठिकाणी पहाटे धुके पाहायला मिळत आहे. दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात आजपासून आगामी पाच दिवस तापमान पुन्हा घसरणार असून थंडीची हुडहुडीही वाढणार आहे.

बुधवारी जळगावचे किमान तापमान १० अशांच्या वर होते. पहाटच्या सुमारास धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तसेच सकाळ आणि रात्रीच्या वेळेस हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत आहे. दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच २२ डिसेंबरपर्यंत किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार असून, कमाल तापमान २९ ते ३१ अंशांपर्यंत राहील. सकाळी धुके आणि रात्री कुडकुडणारी थंडी राहील. दुपारची वेळ मात्र उबदार राहण्याची शक्यता आहे.

१९, २१ आणि २२ डिसेंबरला थंडीची तीव्रता जास्त राहण्याचे संकेत आहे. या काळात किमान तापमानात आणखी काही अंशी घट होऊ शकते. या थंडी वाढीमागे ला-नीना प्रभाव अधिक मजबूत आहे. प्रशांत महासागरातील थंड पाण्यामुळे उत्तर भारतातून कोरडे उत्तर-पश्चिम वारे (नॉर्थ-वेस्टली विंड्स) सतत दक्षिणेकडे सरकू लागले आहेत.
यामुळे रेडिएटिव्ह कूलिंग (रात्रीची थंड होण्याची प्रक्रिया) वेगवान होत आहे. परिणामी धुक्याचे प्रमाण वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत असल्यामुळे असल्याने थंडी तीव्र होत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.







