जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२५ । जळगावात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ महामार्ग क्र. ६ वर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात जळगाव महानगर पालिकेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. विनोद वसंत कोळी (वय ४८) रा. जवखेडा ता. एरंडोल असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

विनोद कोळी हे जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागात पाणी सोडण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. विनोद कोळी हे दुचाकी (क्र. एमएच १९ डी३७२६) ने एरंडोल कडे जात होते. तेव्हा महामार्गावर वराड गावाजवळ त्यांना ट्रक (क्र. एमएच ०४ सीआर ९९९९) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात विनोद कोळी यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातावेळी जोरदार आवाज झाल्याने ते ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी वराड येथून महिला व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी गतीरोधक करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी काही वेळ वाहतूक रोखून धरली होती. पीएसआय उंबरे यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली.