⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्हा राज्यात महिला बचत गटांना वित्त पुरवठा करण्यात दुसरा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विकास अभियानांतर्गत राज्यात महिला बचत गटांना चंद्रपूरनंतर जळगाव जिल्ह्यातील बँकांनी सर्वाधिक कोटींवर वित्त पुरवठा केला आहे. चंद्रपूरमध्ये १७४ तर जळगाव जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांना १६१ कोटींवर वित्त पुरवठा करण्यात आला आहे.

राज्यातील महिला बचत गटांमार्फत विविध उत्पादनांच्या विक्रीतून नफा मिळवून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांच्या उत्पादनांसाठी वाढीसाठी मदत होणार आहे. पतपुरवठ्यामुळे नवीन उद्योग व्यवसायांच्या स्थापनेसाठी मदत होणार आहे. परिणामी महिलांना उद्योजिका बनवण्यास आणि त्यांनी निर्माण केलेल्या उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून नाेकऱ्या निर्माण होतील. राज्यातील महिला बचत गटांना पतपुरवठा करण्याबाबतचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून निश्चित करण्यात येते. या अभियानांतर्गत महिला बचत गटांना स्वयंपूर्ण होण्यासाठी २०२१-२२ मध्ये राज्यातील ३४ जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी बॅँकांना १ लाख ६४ हजार १०० महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी, व्यवसायाच्या वाढीसाठी बँकांकडून वित्त पुरवठा करण्यात आला आहे.

कर्जाची परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांनाही नव्याने कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याने १० हजारांवर बचत गटांना १७४ कोटींवर पतपुरवठा केला. जळगाव जिल्ह्यातील बॅँकांना ६ हजार ९७० बचत गटांना १५३ कोटी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ९ हजार ३६८ बचत गटांना १६१ कोटी ४ लाख ५२ हजारांचा पतपुरवठा केला आहे. १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वर्धा जिल्ह्यात ८ हजारांवर बचत गटांना १८१ कोटींवर वित्त पुरवठा केला. उद्दिष्टांमध्ये अधिक कर्जवाटप स्टेट बँक, सेंट्रल बँक, पंजाब बँक, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांसह ग्रामीण, सहकारी, खासगी बँकांचा समावेश आहे.

जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांचा केला सन्मान
जिल्ह्यातील बँकांनी सन २०२१-२२ मध्ये बँक पतपुरवठ्यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मुंबई येथे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांना प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.