जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । राज्यातील तापमान घसरण होत असून यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी राज्यातील सर्वात नीचांकी 8 अंश तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली. आता डिसेंबर अखेर ते 2 जानेवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जानेवारीदरम्यान पुन्हा नव्याने पश्चिमी चक्रवात हा हिमालयावर धडकणार असल्याने उत्तरेकडून येणारे वारे आणि थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील थंडीचा कडाका वाढला असून आठवडाभर तरी हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे इयर एन्डपर्यंत गुलाबी थंडीचा जोर राहील. तर नवीन वर्षाचे आगमन मात्र पावसाने होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ५ ते ६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्याचे तापमान 12 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढू शकतो. मंगळवारनंतर आकाश किंचित ढगाळलेले असेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.








