जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता. तापमानात वाढ झाल्याने उकाडा काहीसा जाणवत होता. मात्र आता नोव्हेंबरच्या अखेरीस पुन्हा वातावरणात बदल झाला. जळगावच्या तापमानात शनिवारी एकाच दिवसात ७ अंशापर्यंत घसरण झाली. यामुळे थंडीचं पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे.

गेल्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान व किमान तापमानात वाढ झाली होती. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) किमान तापमान १७ अंशांवर पोहोचले होते. यात काल शनिवारपासून बदल झाला आहे.

शनिवारी एकाच दिवसात किमान तापमान ६ अंशांनी घसरून ११.५ अंश सेल्सिअस वर पोहोचले. दिवसाच्या तापमानातही घसरण झाली. कमाल तापमान २८ अंशापर्यंत घसरले आहे. यामुळे थंडी वाढली. वेस्टर्न डिस्टर्बन्स, वायुदाबात बदल, वाऱ्यांचा प्रवाह व आर्द्रतेचा अभाव हे घटक थंडी वाढीस जबाबदार आहेत. रविवार, ३० नोव्हेंबरपासून किमान तापमान कमी होणार असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली







