पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे : डॉ.मानसी चौधरी

फेब्रुवारी 20, 2024 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२४ | नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूर विद्यापीठाच्या ११ व्या पदवीप्रदान समारंभात जळगाव येथील डॉ. मानसी योगेश चौधरी हिला कनुभाई पशुवैद्यकिय सावडीया सूवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. वेटरनरी पब्लिक हेल्थ (VPH) या विषयात सुवर्ण पदक मिळवल्याचे मानसीने पत्रकार परिषदेत सांगितले. व्हेटरनरी क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुलींना खूप उत्तम संधी आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही हवा तितका सन्मानाचा नसल्याची खंत तिने व्यक्त केली.

mansi chaudhari jpg webp

११ व्या पदवीदान समारंभात २०२१-२४ या शैक्षणिक वर्षात व्हेटरनरी १५४० पदवीधर, १९९ पदव्युत्तर, ३० डॉक्टरेट अशा एकूण १७६९ जणांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभातील उत्कृष्ट, शैक्षणिक कामगिरीबद्दल ७२ सुवर्णपदके, २३ रोज पदके आणि २५ हजार रुपयांची तीन रोख पारितोषिक देण्यात आली. विशेष म्हणजे २८ पदके आणि तिन्ही रोख पारितोषिके मुलींनी मिळवली आहेत.

या पदवीदान समारंभाला राज्यपाल रमेश बैस, कुलप‌ती (MATSU) हे अध्यक्षस्थानी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. डॉ. ए.के.श्रीवास्तव, कुलगुरु (DUVASU, मथुरा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ.नितीन व्ही. पाटील, कुलगुरू (MAFSU) हे उपस्थित होते. प्रसंगी प्रतिकुलपती MAFSU यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.

VPH हा विषय प्राणी व माणूस या दोन जमातीचे इंटरसेक्शन आहे. यामध्ये माणसांना प्राण्यांपासून किंवा प्राणीजन्य पदार्थांपासून (दुध, मांस, मासे इ,) होणारे आजार जसे की रेबीज, लान्याखुना (FMD), लेप्टोस्पकरोसिस, सालमोनेलोसिस, ब्रुसेलोसिस इ. तसेच जनावरांना माणसांपासून होणारे आजार – टुबरक्युलोसिस इ. यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये या आजारांच्या उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजनेवर भर दिला जातो. तसेच यात Emdemilogy म्हणजेच एखादा आजार किती टक्के लोकसंख्येला प्रभावित करतो, लोकसंख्येचे वय, लिंग, राहणीमान अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात. या सगळ्या सोबत पर्यावरणीय स्वच्छता व सुरक्षा यांच्यासंबंधित कायदे व उपाययोजना तयार करण्यात येतात.

दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस – मासे, अंडी इ. यांच्या उत्पाद‌नात योग्य ठिकाणी, योग्य त्यावेळी योग्य ते कायदे व उपाययोजना अमलात आणून मानवजातीचे हित जोपासले जाते. पशुआहार, त्यांचे राहाणीमान, शरीरशास्त्रासोबत त्यांना होणारे रोग, त्यांचे रोगनिदान व उपचार, विविध शस्त्रक्रिया तसेच प्राणी प्रजनन व अनुवंशिकता Extension कार्य (शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविणे) इत्यादींचा समावेश होतो.

भारत हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश आहे. तसेच अंडी उत्पाद‌नात जगात तिसरा देश आहे. मांस उत्पादनात आठवा आहे. भारत कृषिप्रधान असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था शेती व पशुपालनावर आधारीत आहे. आपल्या देशातील अनिश्चित, हवामान व पाऊस यामुळे पशुपालन हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे उपजिवीकेचे साधन आहे. त्यादृष्टीने पशुविधान व पशुचिकित्सा हे एक महत्त्वाची भूमिका बजावणार क्षेत्र आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षणाकामी डॉ.मानसी चौधरी यांना डॉ.शिलश्री शिंदे, डॉ.संदीप चौधरी, डॉ.नितीन कुरकुरे, डॉ. सुनिल कोलते, डॉ.संजय बानुवाकोडे, डॉ.मनोज पाटील व डॉ.शितल चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे मानसीने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now