जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यात जळगाव जिल्ह्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले असून हे निर्णय वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. त्यामध्ये जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
-अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
-सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
-राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
-जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
-पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)